रविवार, ८ डिसेंबर, २०१३

शिवथरघळ





शिवथरघळ ही रायगड जिल्ह्यात येणारी घळ आहे. ती महाडपासून तीस किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. काळच्याया काठावर कुंभे कसबे, व आंबे अशा तीन शिवथर वस्त्या आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार झाडाझाडोऱ्याने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी सुंदर मठम्हणत असत. या हिरव्या डोंगरावर पांघरलेली पांढ-याशुभ्र ढगांची चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टिचा सहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा आध्यात्माचा स्पर्श....हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही. समर्थांनीही ज्याचे वर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुती येथे आल्याशिवाय मिळत नाही. शिवथरघळ आणि आजुबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले होते. पुढे १६४८ मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि समर्थ रामदास सन १६४९ मध्ये या घळीत वास्तव्यासाठी आले. ते नंतर सन १६६० पर्यंत म्हणजे दहा-अकरा वर्षे या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची सात आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. सन १६७६ मध्ये दक्षिणदिग्विजयासाठी जातांना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊनच छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले. 
 
आजच्या जगाला या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थभक्त श्री शंकर कृष्ण देव यांनी १९३० साली लावून दिला.
पायऱ्याया चढून आल्यावर समोरच शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीने स्थापन केलेली इमारत लागते. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो डोंगराच्या कपारीत १००-१५०माणसे बसू शकतील एवढा घळीचा आकार आहे.. घळीमधे रामदासस्वामींची मूर्ती आहे. घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. तो धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळत असतो. घळीच्या वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. परिसरात भोजन मंडप ,सभागृह, गणेशमंदिर  राहण्यासाठी ,भक्तनिवास आहे. या सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत.
शिवथरघळीला जाण्यासाठी पायथ्यापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. पुढे १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण घळीपाशी पोहोचतो. मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या पुढे एक नदीवरील पूल लागतो. त्याच्या पुढे डाव्या बाजूला भोरकडे जाणारा वरंध घाटाचा फाटा लागतो. या रस्त्याने भोरच्या दिशेला जातांना बारस गाव आहे. येथे शिवथरकडे अशी पाटी लावली आहे. येथून पुढे साधारण ३० किमी अंतर पार केल्यावर आपण शिवथरघळीच्या पायथ्याशी पोहोचतो. वाटेत कुंभे शिवथर, कसबे शिवथर, अंबे शिवथर ही गावे लागतात.

महाड पासून ३४ कि.मी अंतरावर घळ आहे .महाड -पूणे-पंढरपूर मार्गावरून बारसगाव येथूनघळीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे.एस.टी अथवा खासगी वाहनाने येथे जाता येते .कोकणरेल्वे मार्गावरील वीर तसेच माणगाव स्थानक जवळचे रेल्वेस्थानक आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा