महाराष्ट्राचा
इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-2
निरनिराळ्या काळातल्या ग्रंथकारांनी
दक्षिणापथाची मर्यादा ही अशी
सांगितली आहे. उत्तरमर्यादा नर्मदा आणि
दक्षिणमर्यादा मात्र अनिश्चित अशी
दक्षिणापथाची स्थिती होती. कधी कधी महाराष्ट्र
व दक्षिणापथ ही दोन्ही नावं एकाच प्रदेशास अनुलक्षून स्थूल अर्थानं
वापरलेली दिसतात. या दक्षिणेकडील प्रदेशाची आर्यांना फारशी माहिती नव्हती.
त्यांच्या परिचयाचे प्रदेश म्हणजे
आर्यावर्त आणि मध्यप्रदेश.
तिथेच त्यांचं मांत्रिक पठण, यज्ञकर्मं वगैरे चालत
असे. या देशाच्या पलीकडे कोणी
आर्य गेलेच तर व्रात्य म्हणून पतित होत
आणि पुन्हा आर्यांच्या समाजात
सामावून घेण्यासाठी त्यांना
व्रात्यस्तोमासारखे विधीही करावे लागत.
आर्यावर्ताच्या बाहेर जाण्यासंबंधी असे
सक्त निर्बंध असल्यामुळे सामान्य
जनतेचा चौफेर संचार नव्हता. दक्षिणेकडे
जायचं म्हणजे वनवासात जायचं असा
प्राचीन काळी समज होता. या धार्मिक
निर्बंधांबरोबरच निसर्गही फारसा अनुकूल
नसल्यानं दक्षिणप्रांत आर्यांच्या
ताब्यात येण्यासाठी उत्तरेकडील
प्रदेशापेक्षा जास्त वेळ लागला. विंध्य, पुढे सातपुडा, दोन्ही बाजूंस सह्याद्रीच्या डोंगराळ खबदाडी. असा खडतर प्रवास उत्तरेकडील
संपन्न व समृद्ध प्रांतांत सुखावलेले आर्य का ओढवून घेतील? म्हणूनच पुष्कळ काळ
दक्षिणेकडील प्रांत आर्यांच्या दृष्टीने दंडकारण्यच राहिला.
महाराष्ट्राच्या वसाहतीसंबंधी एक
पौराणिक आणि दुसरं ऐतिहासिक, अशी दोन
मतं मांडता येण्यासारखी आहेत. या दोन्ही
मतांत काळाच्या दृष्टीने फार अंतर
आहे. यांपैकी पौराणिक मत आपण प्रथम
पाहू. पौराणिक दृष्टीने महाराष्ट्रातील
वसाहत ऋग्वेदसूक्तांच्या
संहितीकरणापूर्वी, किंबहुना ऋग्वेदात उल्लेखलेल्या दाशराज्ञ
युद्धापूर्वी झाली, असं म्हणता येतं. पौराणिक मत डॉ. केतकर यांनी आपल्या
प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात मांडलं आहे. महाराष्ट्राचे स्थूलमानाने अपरान्त, विदर्भ
आणि दंडकारण्य असे तीन भाग पडतात. त्यांपैकी पश्चिमेकडील अपरान्त (कोकणपट्टी) भृगु आणि त्याच्या वंशजांनी फार प्राचीन काळी, म्हणजे भार्गवरामाच्या - परशुरामाच्या- अवताराच्याही पूर्वी वसवल्याचं
पुराणांवरून ठरतं. कोकण म्हणजे परशुरामाची कर्मभूमी आणि परशुरामाच्या कथेशी
कोकणातील कोकणस्थ, देवरुखे, हैंग, नंबुद्री इत्यादी अनेक जातींचा संबंध येतो. भडोचचे जुने नाव
भृगुकच्छ असं आहे. परशुरामाचं
पूजन कोकणात अनेक ठिकाणी होतं. सोपार्यात आजही परशुरामाच्या अनेक मूर्ती आहेत. पश्चिम
भाग जसा भृगुंनी तसा पूर्व भाग अगस्त्यांनी वसवला. या दोन पट्ट्यांच्या
मधला भाग मात्र शापदग्ध असल्याने तितकासा वसाहतयोग्य नव्हता.
इक्ष्वाकुवंशातील दण्डक नावाच्या राजाने भृगुवंशातील च्यवन नावाच्या ऋषीचा अपमान
केल्यामुळे ऋषीने दण्डक राजाला शाप दिला. त्या शापाच्या प्रभावाने विंध्यापासून सेतुबंधापर्यंतचा प्रांत अरण्यमय झाला. दण्डकारण्य या नावाची ही उत्पत्ती.
कोकणासंबंधी निरनिराळ्या कथा पुराणांत
आहेत. सह्याद्रीच्या उपप्रांतांत
आपल्या पर्वतप्राय लाटा आदळून त्याच्या
उच्चत्वाच्या स्पर्धेनं सूड
घेणार्या समुद्रास परशुरामाने मागे
हटवून आपल्यासाठी व आपल्या
यज्ञकर्मासाठी भूमी तयार केली आणि चैत्यपुलिन
(चिपळूण) इथे स्थंडिल तयार करून
त्यासाठी कोळ्यांच्या जाळ्यांची जानवी करून त्यांना ब्राह्मणांची दीक्षा
देऊन किंवा चितेवरील प्रेतांत प्राणज्योती पेटवून त्यांना ब्राह्मण्य
दिले वगैरे कथा प्रसिद्ध आहेत. या प्रांतास पूर्वी अपरान्त म्हणत असत व त्याची मर्यादाही मोठी, म्हणजे उत्तरेला
आनर्तापासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत,
अशी होती. या प्रांतास कोकण
कधी म्हणू लागले, यासंबंधी ठाम प्रमाण
मिळत नाही. नागांची जी कुळं महाभारतात सांगितली आहेत, त्यांत कुकुण
असं एक कूळ आहे, आणि ते या प्रांतात
खाली गोकर्णापर्यंत राहत होते, असा एक
दाखला आहे. तेव्हा या कुकुण नागकुलाचा
आणि कोकण या नावाचा काही संबंध असू
शकतो.
कोकण या नावाची उपपत्ती
आजपर्यंत पुष्कळांनी निरनिराळ्या
प्रकारांनी दिली आहे. जुन्या संस्कृत
आणि फारसी ग्रंथांत कोकण हा शब्द
निरनिराळ्या प्रकाराने लिहिलेला आढळतो.
संस्कृतात कुकुण, कुङ्कुण,
कोङ्कण, कोंकण ही रूपं दिसतात,
तर फारसीमध्ये केङ्केम, कंकण, कोंकम् ही रूपं दिसतात. या
कोकण शब्दाच्या
व्युत्पत्तीबद्दल अनेक मतप्रवाह दिसतात.
१. कोकण हा शब्द द्राविडी भाषेतून घेतला
असावा.
२. कानडीत कोङ्कु असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ उंचसखल जमीन असा आहे. कोङ्कु + वन = कोङ्कुवन = कोकण अशा मार्गाने हा शब्द आला असावा.
३. फारसीमध्ये कोह (=पर्वत), कुण्ड (=खाच, खड्डा) असे दोन शब्द अहेत. कोहकुण्ड = कोकुण्ड = कोकण अशा मार्गाने हा शब्द येतो. त्याचाही अर्थ पर्वतांच्या खाचांचा प्रदेश असा होतो.
४. किम् + किण्वम् (कसली ही वनस्पती?) अशा तर्हेचा प्रश्न पहिल्या वसाहतकारांनी उन्मादक ताडीसंबंधी विचारला असावा व त्यावरून कोकण हा शब्द आला असावा.
५. कोंग नावाचे रानटी लोक प्रथम या प्रांतात वसले असावेत आणि त्यावरून या देशास कोंगवन (=कोकण) हे नाव मिळालं असावं.
२. कानडीत कोङ्कु असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ उंचसखल जमीन असा आहे. कोङ्कु + वन = कोङ्कुवन = कोकण अशा मार्गाने हा शब्द आला असावा.
३. फारसीमध्ये कोह (=पर्वत), कुण्ड (=खाच, खड्डा) असे दोन शब्द अहेत. कोहकुण्ड = कोकुण्ड = कोकण अशा मार्गाने हा शब्द येतो. त्याचाही अर्थ पर्वतांच्या खाचांचा प्रदेश असा होतो.
४. किम् + किण्वम् (कसली ही वनस्पती?) अशा तर्हेचा प्रश्न पहिल्या वसाहतकारांनी उन्मादक ताडीसंबंधी विचारला असावा व त्यावरून कोकण हा शब्द आला असावा.
५. कोंग नावाचे रानटी लोक प्रथम या प्रांतात वसले असावेत आणि त्यावरून या देशास कोंगवन (=कोकण) हे नाव मिळालं असावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा