समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’ "संत गाडगेबाबा"
गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी१८७६ अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे
पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी,
मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची
बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः
गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.
१८९२ साली त्यांचे लग्न
झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व
मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला
दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे
असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व
जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना
शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास
स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही
त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास
त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न
ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक
खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके
गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू
लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक
स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी
स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर
करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या
मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न
विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत
असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू
नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची
हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून
सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर
ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’
असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते
ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी
संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला.
‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना
गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून
देत.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी
धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक
नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची
व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
त्यांच्या कीर्तनाचे
शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे
चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते तसेच आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणत 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात,तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'.
|
कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर
|
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’
असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या
कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले
जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार
आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला
देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा
असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे व त्यांचा मृत्यू २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (जिल्हा अमरावती) येथे झाला.
अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देवून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा